खरसुंडीच्या बाजारचं 'लाल सोनं'

  


"दामू आण्णा" भल्या पहाटे उठले, गावाच्या बाहेर आडावर जाऊन चार-पाच घागरी पाणी आणलं, आतला अन् बाहेर जनावरांच्या गोठ्यात असलेला रांजण दोन्ही पाण्याने भरून ठेवला.

आज आयतवार 'खरसुंडी' चा बाजार....

बाजाराला जायचं होतं म्हणून आण्णांनी आदल्या दिवशीच बैलगाडीची साठी भरून जुंधळ्याचं बाटुक आणून दारात ठेवलं होतं. दारात चार जितराब हुती.

बाजारला जाणाऱ्या टेम्पोवाल्याला पण सांगून ठेवलं हुतं. टेम्पोवाल्याची गाठ घेतली तवा टेम्पोवाला घरी येऊन आण्णांना म्हणाला, 

आण्णा ... कायं बाजार काढला का काय? त्यावर आण्णा  म्हणाले,

आरं! दिवाळी सण संपला, किराणा मालवाल्याचं आणि कापड दुकान वाल्याचं जरा पैसे द्यायचं हायतं. म्हणून जरा 'कांदं' इकायं काढलं बघ.

कांदं...? दावा बरं कसला माल हाय? काय दर निघंल ते तरी बघूया....

आण्णांनी परड्यातल्या सपरात जाऊन मोठा, मध्यम, बारिक  आसं कांदं टेम्पोवाल्याला दाखवलं.

टेम्पोवाला म्हणाला...


आण्णा! मध्यम माठाचा कांदा घ्या,

मजी बीगी खप हुतु. 

आणि तुमचा कांदा राव एक नंबर हाय. नुसता एक नंबर न्हवं तर लाल सोनंच हाय राव.

गिऱ्हाईक भूईलां पडून द्यायचं न्हाय तुमचा माल. गुळाचा खडा उचालल्यावाणी पटापटा उचलत्याली.

बरं किती पुती घेताय ?

आण्णा म्हणाले, एक पोतं बास बाबा, पुना खपंना मजी काय करायचं...?

एक पोतं ? 

आण्णां येड्यागत करू नगा, मी म्हणतू म्हणून दोन पोती घ्या. पुना माल पुरला न्हाय मजी मागारी याचं हूतं व्हयं, आणि तुमच्या कांद्याला कसा बी 'दोन रुपये' किलो दर मिळेल बघा.

तुमचा कांदा बी लय बेस हाय.

टेम्पोवाल्याच्या बोलण्याने आण्णा खुश झाले.

आणि दोन कांद्याची गच्च पोती भरली. आणि उंबऱ्याच्या बाहेर रात्रीच आणून ठेवली होती.

सकाळी तांबडं फुटायला गावाच्या बाहेर शाळेच्या समोर बाजारचा टेम्पो उभा होता.

आण्णांनी एक वर एक करत दोन पोती आणून टेम्पोत टाकली होती.

पोती टाकायला टेम्पोत जागा नव्हती. कुणाची भाजी, कुणाची वांगी, कोथिंबीर, असं सगळं माळव्यानं टेम्पो गच्च्ं भरला होता.

आत बसायला जागा न्हवती. टेम्पोच्या मागल्या बाजूला चार-पाच रस्स्या बांधून सोडल्या होत्या, त्या रस्सीला धरून मागे फाळक्यावर बसून कसरत करत आण्णांना जावे लागलं.

दिवस उगवायला घाट उतरून गाडी खरसुंडीत पोहचली. समद्यांनी पटापटा आपल्या माळव्याच्या पाट्या, पोती उतरली आणि आपापल्या जागेवर बसायला सुरुवात केली. आण्णांला कुठं जागाच मिळेना.

एका जागेला नेऊन पोती ठेवली आणि बारदानं हातरणार..., तेवड्यात नऊवारी साडीचा कासुटा नेसलेली, कपाळाला भला मोठा हळदी कुंकवाचा टिळा, हात कोपरा पातुर भरुन हिरव्यागार बांगड्या, गळ्यात आन् कानात मावनात एवढं दागिनं, पायात जवळजवळ दहा एक भाराची जोडवी आणि मासुळ्या, ते कमी म्हणून जाड जूड धनगरी चपल्या, हातात पान तंबाखूची थैली अशा अवताराचे  आणि तोंडाचा पट्टा चालू असलेलं एक वादळ आण्णाजवळ येऊन थबकलं.

त्यांच्या माना मोडल्या, यांच्या किरड्या मोडल्या, यांचा मुडदा  बसिवला, आशा काय शिव्या  देताच, दोन हमाल पोरं पळतच आली. पटापटीच्या इजारी, अंगात दंडकं, नारंगी रंगाच्या टावेलाची टापरी बांधलेली. अशी चुनचुनित दोन पोरं पळत आली, आणि पालाच्या खूट्या ठोकायला सुरुवात केली, त्यावरून आण्णांनी अंदाज बांधला ही कोणी तरी करगणी भागाकडील  व्यापारीण असणार...

आण्णांनी त्यांचं बस्तान हलवलं आणि पालाच्या मागच्या बाजूला जाऊन बसणारं तेवढ्यातं तिथं बी एक जणानं सांगितलं ये बाबा हितं बसू नको, ही व्यापाऱ्याची वळ हाय. त्या तिकडे गुराच्या बाजाराकडं  मोकळी जागा हाय तिकडं  जाऊन बसं.

आण्णांनी पुन्हा ते बस्तान हलवलं आणि बाजाराच्या बाहेर एका टोकाला जाऊन आण्णानं बारदानं हातारलं आणि कांद्याचं आर्धं पोतं बारदानावर ओतलं. आणि आण्णा गिऱ्हाईकाची वाट पाहू लागले.

तेवढ्यात श्री सिद्धनाथाच्या मंदिरातील घंटा वाजू लागला आणि आरती चालू झाली. आण्णांनी बसल्या जागीच चांगभलं ऽऽऽ म्हणत सिद्धनाथाला हातं जोडलं.

बाजार भरत चालला होता. व्यापारी लोक मालाचे टेम्पोच्या टेम्पो भरून घेऊन येतंच होती.

त्यात मंदिरात जाणाऱ्या भाविकांची गर्दी पण होऊ लागली होती. एकंदरीत बाजार बऱ्यापैकी भरला होता.

तेवढ्यात दोन गडी पांढरा लेंगा, गुडघ्या पातूर लांब सदरा आणि खानदेशी टोप्या, असा पेहराव केलेला... हळूच आण्णा जवळ आले, आणि म्हणाले कसं द्याचं म्हणताय कांदं बाबा...?

आण्णा म्हणाले, किती किलू पायजीत?

त्यातील एक जण म्हणाला किलू  बिलू काय न्हाय... उक्तंच बोला किती द्याचं समद्या कांद्याचं ? आण्णांनी ओळखलं ही व्यापारी हायतीं ...        

पण टेम्पो वाल्यांनं सांगितलं होतं, आण्णा गेल्या गेल्या व्यापारी लोकं येत्याती माल कमीनं मागत्याती आणि वजनाचा बी काही हिशोब लागत न्हाय. आन आपल्याला बरोबर गंडीवत्याती. त्या परास आपण बसूनच इकायचं. 

आण्णांचा नकार ऐकून ते व्यापारी लोक हुज्जत घालून पुढे निघुन गेली.

बऱ्याचं उशिराने 'लमाणी' समाजातील एक दोन महिला आण्णांच्या कांद्याजवळ येऊन थांबल्या आणि  विचारलं कसे दिले बाबा कांदे?

आण्णा उत्तरले ! "दोन रुपये" किलो मावशी...

तशी एक बया खासकन् खेकसुन बोलली...,

 ये बाबा! समदा बाजार रुपया किलू कांदं दितुया, आन् तुझ्या कांद्याला " काय सोनं लागलंय का?"

का तू कुठनं इलायतितनं आलाय

दोन रुपये किलूनं दितुयं... 

त्या बाईच्या बोलण्याने आण्णाचा पार चेहराच उतरला. 


न्हाय - नगं म्हणावं तर पहिलंच गिऱ्हाईक..., पहिलाचं कशाला नाट लावा म्हणून आण्णांनी वायरच्या पिशवीतून तागडं काढलं, बाजूवाल्या व्यापाऱ्याकडून किलोचं वजन घेतलं आणि आण्णा म्हणाले. बरं किती किलू देऊ....?

द्या! दोन किलो...!

दोघीला एक एक किलो.

दोघींनी दोन किलो कांदे घेतले. आणि दोघींनी पण 'पाच' 'पाच' रुपयांची नोट म्होरं केली. 

आता मोठा प्रश्न, सुट्टं पैसे कुठूनं आणायचं...?

तेवढ्यात पुन्हा त्यातली एक बया म्हणाली, ये बाबा पैसं सुट्ट न्हायतं का?

न्हाय ओ ! आण्णा म्हणाले.

बरं, आणा इकडे ते पैसे, म्होरं जावुन माळवं घेतो आणि जाताना तुमचे पैसे देऊन जातो.

आण्णांनी पैसे माघारी दिले.

त्या बायका माळवं आणाय गेल्या. पण आण्णांचं सगळं ध्यान त्यांच्यावरच. माघारी येत्यात्या का नाही याचा ईसवास लागंना.

अर्ध्या एक तासाने त्या बाया माघारी आल्या आणि आण्णांच्या हातात त्यांनी दोन रुपये टिकिवलं.

आण्णांनी ते दोन रुपये दंडक्याच्या खिशात ठेवलं.

तोपर्यंत ऊन चांगलंच वाढलं होतं. जवळजवळ दहा वाजून गेले होतं. पोटात बी कावळं ओरडायला लागलं होतं... आण्णांनी वायरच्या पिशवीतनं  भाकरीचं गटूळं काढलं. जोंधळ्याची भाकरी आणि खर्डा दिला होता.

बसल्या जागीच दोन भाकरी आण्णांनी संपवल्या, आणि बाजारात पाण्याचा टँकर उभा होता, तिथे जाऊन पाणी पिऊन आलं.

थोड्या वेळाने आणखी एक गिऱ्हाईक आलं आणि त्यांनी उद्धटपणाने कांद्याला पाय लावून कांद्याचा दर विचारला. आण्णांनं वर बघितलं. एक बया पंजाबी ड्रेस घातलेली बहुदा कुणा नोकरदाराची बायको आसंल, पण कांद्याला पाय लावलेलं आण्णाला सोसलं नाही ते बघून आण्णाची तळपायाची आग मस्तकाला गेली. पण काय करायचं...?

बऱ्याच वेळाने गिऱ्हाईक आलं होतं. राग आवरून अण्णांनी विचारले, किती किलो देऊ?

द्या "अर्धा किलो" आता पुन्हा प्रश्न पडला. अर्धा किलो वजन कुठून आणायचं...?

त्यात आण्णांनी शक्कल लढवली. एक किलो कांदा वजन केलं आणि दोन्ही पारड्यातं निम्मं निम्मं करून जडं पारडं त्या बयाच्या पिशवीत ओतलं त्या बयाने "आठ आणे"  हातात दिले. आणि जाता जाता "हलकट" स्वभावाने दोन कांदे उचलून पिशवीत घातलं.


जवळजवळ दुपार झाली होती, बसून बसून आण्णाला पेंग आला होता. तेवढ्यात "हलगी"च्या आवाजाने आण्णा दचकले.     आजूबाजूला पाहिलं तर कोणी एक बडा शेतकरी "दुश्या खोंडांची" जोड बाजारातून मिरवत सिद्धनाथाच्या देवळाला  प्रदक्षिणा घालायला घेऊन चालला होता. निम्मा बाजार तिकडे 'टाचा' वर करून बघत होता.

गुलाल उधळला जात होता. त्याच्याबरोबर चिरमुरे पण उडत होते. "सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं" अशी हाळी देत तो ताफा निघून गेला.

सकाळपासून एका जागेला बसून बसून आण्णाच्या पायाला मुंग्या यायला लागल्या होत्या, पण उठून कुठे जावं तरी एखादं गिराईक ईऊन जाईल म्हणून आण्णा म्याक मारल्यागत एका जागेला सकाळपासून बसून होता.

एव्हाना दिस मावळतीला गेला होता. पाखरांची किल्लबिल उठली होती. बगळ्यांचे थवे, कावळ्यांचे थवे आपल्या घरट्याकडे माघारी निघाले होते. आण्णांचे 'दहा' एक किलो कांदे विकलं होतं बाजार फुटायला लागला होता.

व्यापारी लोकं आपापली पालं गुंडाळून टेम्पोची वाट बघत बसली होती. आण्णाला वाटायला लागलं सकाळचं ते व्यापारी हजार बाराश्याला कांदं न्हीतू म्हणतं हुतं, दिलं असतं बरं झालं असतं.

आण्णा बी टेम्पोची वाट बघत राहिलेलं कांद पोत्यात भरून बसलं होतं. टेम्पोवाला बी हाटकून पार कडूसं पडल्यावर आला, कांद्याची पोती तशीच्या तशी बघून, टेम्पोवाला म्हटला.. आण्णा...! कांदं काय इकलं नाहीत वाटतं...?

काय करायचं आज बाजारात तो लोणंदचा कांदा आला होता.

अडीच का तीन महिन्याचा.

आठं आणे, बारा आणे किलोनं. माणसांनी नुसत्या पिशव्याच्या पिशव्या भरून न्हेल्या.

"देशी कांद्याला" बघाय माणूस नाही. आणी दर बी न्हाय आज.

टेम्पो गावाच्या दिशेने निघला. पार अंधार पडला होता. टेम्पो गावात आला. आण्णांनी  टेम्पो वाल्याला त्याचं भाडं विचारलं...,

आण्णा... ! सकाळी जायाचं 'पाच' आणि आता याचं 'पाच' 'दहा रुपये' झाले बघा.

आण्णांनी दंडकीच्या खिशातनं दिवसभराची दहा रुपयाची चिल्लर काढली आणि टेम्पो वाल्याच्या हातातं ठेवली. 

आणि रिकामा खिसा झाडला.

आण्णांनी कांद्याची पोती परड्यातील सपरात आणून टाकली. घरापाशी येऊन बाहेर चौकटीला हातातली वायरची मोकळी पिशवी अडकवली. रांजणातल्या पाण्याने हात पाय धुतले, चूळ भरली.

आणि उंबऱ्यावर विचार करत बसले. बायको मुलांना काय उत्तर द्यायचं ? आणि कापडं वाल्याला आणि किराणा वाल्याला काय सांगायचं....?

बायकोनं चहाचा कप हातात देत आण्णांच्या कडे बघितलं... आण्णांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या दोन-दोन धारा वाहत होत्या.

ती न सांगताच सगळं काही समजून गेली होती, पण मुलं मात्र हिरमुसल्या तोंडानं चौकटी वरची  वायरची पिशवी चापचंत आण्णांच्या तोंडाकडं नुसती  बघतं हुती ...

✍🏻श्री.लक्ष्मण दादासाहेब पवार...

🏞️जाधववाडी ,ता.खानापूर.

🌈तिरुपत्तूर,तमिळनाडु.

📞९४८८३०४२८८.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या