स्व. अनिलभाऊंप्रमाणेच विकासकामांना न्याय देईन : सुहास बाबर

खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहासभैय्या बाबर यांनी आटपाडी तालुक्यात संवाद दौऱ्याला सुरुवात केली. सरपंच ते आमदार असा प्रदीर्घ जनसेवेचा वसा चालविणारे दिवंगत आमदार अनिलभाऊंच्याप्रमाणेच अखंडित जनसेवा आणि विकासकामांना न्याय देईन, अशी आश्वासक ग्वाही देत सुहासभैय्या बाबर यांनी जनतेला साद घातली.

खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहासभैय्या बाबर यांनी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या साथीने आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी, हिवतड, काळेवाडी, तळेवाडी, पात्रेवाडी, माळेवाडी, करगणी, बाळेवाडी, बनपुरी, तडवळे, मासाळवाडी आणि लेंगरेवाडी या गावामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना सुहासभैय्या बाबर म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर अनिलभाऊंनी राजकीय सामाजिक क्षेत्रात वाटचाल केली. हे करत असताना जनतेलाच त्यांनी कुटुंब मानले. शेवटच्या श्वासापर्यंत मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करणे, टेंभूचा पाण्याचा प्रश्न निकाली काढणे, लोकांचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न सोडविणे यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या अकाली निधनानंतर मतदारसंघातील जनतेने, कार्यकर्त्यांनी, वडीलधाऱ्यांनी आम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद दिले. खानापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, विकासकामांमध्ये आघाडीवर असलेला खानापूर विधानसभा मतदारसंघ आणखी गतीने अग्रभागी ठेवण्याची जबाबदारी एक जनसेवक म्हणून मी पार पाडेन. संपूर्ण मतदारसंघ आणि सामान्य जनता हीच आमची शक्ती असून त्या कुटुंबाचे ऋण सदैव आमच्यावर आहे. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करत सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यासाठी सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद या निवडणुकीत आमच्या पाठीशी राहू द्या, असे आवाहन सुहास बाबर यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचा जनसेवेचा वारसा जपण्यासाठी सुहासभैय्यांना आमदार करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ऐतिहासिक राजेवाडी तलावात पाणी आणून सुहासभैय्या आणि आम्ही शेतकरी उन्नतीचा नवा अध्याय कार्य निर्माण केला आहे. अशक्य ते शक्य करण्याची ख्याती अनिलभाऊची होती. तेच काम सुहासभैय्या करत आहेत. त्याची चुणूक राजेवाडी तलावामध्ये पाणी आणून दाखवून दिली आहे. प्रतिवर्षी राजेवाडी तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून सुहासभैय्या बाबर यांच्या पत्रामुळे निकाली निघाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत लोकांनी जागरूकपणे कामाचा आढावा घेऊन सक्षम आणि सरस उमेदवार म्हणून सुहासभैय्यांना शक्ती द्यावी, असे आवाहनही तानाजीराव पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या