SB मराठी (महादेव धनवडे) : खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले तर 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आटपाडीचे ब्रह्मदेव पडळकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणामध्ये प्रमुख तीन उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे. त्यामध्ये महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील, तर अपक्ष म्हणून आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख हे प्रमुख तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत. ज्या त्या उमेदवाराची ताकद आपापल्या भागामध्ये आहे ब्रह्मदेव पडळकर यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे ब्रह्मदेव पडळकर यांची ताकद कुणाला तारणार आणि कुणाला मारणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व ॲड. सदाशिवराव पाटील भाऊ यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली होती.यावेळी आत्ता उभे असलेले आटपाडीचे उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासहित ब्रह्मदेव पडळकर यांची ताकद अनिल भाऊ बाबर यांच्या पाठीशी होती. या निवडणुकीमध्ये अनिल भाऊ बाबर विजयी झाले होते. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. अनिल भाऊंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुहास भैया बाबर हे निवडणूक लढवीत आहेत. तर त्यांच्या विरोधात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील उभे आहेत. तर अनिल भाऊ बाबर यांना पाठिंबा दिलेले राजेंद्र अण्णा देशमुख हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ब्रह्मानंद पडळकर काय भूमिका घेतात आणि त्यांची भूमिका कोणाला तारक ठरणार आणि कुणाला मारक ठरणार हे लवकरच समजेल.
0 टिप्पण्या