महायुती सरकारची आज शेवटची ‘कॅबिनेट’
मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुका वेळेत व्हाव्यात आणि 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन व्हावे यासाठी 13 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. 8) मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली असून, हे अखेरचे मंत्रिमंडळ ठरू शकते. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनीय सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. 7) सोलापूर दौऱ्यावर होते आणि मंगळवारी सोलापुरात वनचपूर्ती सोहळा होणार असतानाही ते बैठकीसाठी मुंबईत परतले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत सोलापुरात मंगळवारी (दि. 8) दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा होणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 4 नंतर होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी ‘मंत्रालय टाइम्स’च्या वार्ताहराशी बोलताना दिली. दरम्यान, गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आणि आता आज पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने सोमवारी मंत्रालयातील विविध विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून या मंत्रिमंडळात शंभरहून अधिक विषय ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या मंत्रिमंडळात आणखी कोणकोणत्या योजना जाहीर होणार असून, त्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 13 ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास दिवाळीनंतर लगेचच मतदान होईल आणि 26 नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार सत्तेवर येऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी साधारणत: लागतात ३५ दिवस
राज्याचे नवीन सरकार २६ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत साधारणपणे ३० ते ३५ दिवस लागतात.
– गणेश निर्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
निवडणूक ते सत्ता स्थापनेपर्यंत लागतातच इतके दिवस
आचारसंहितेनंतर तयारी : ५ ते ६ दिवस
उमेदवारी अर्ज भरणे : ७ दिवस
छाननी व अंतिम यादी : १ दिवस
अर्ज माघार : २ दिवस
प्रचारासाठी दिवस : १२ ते १५ दिवस
मतदान व निकाल : ३ ते ४ दिवस
सरकार स्थापनेसाठी अवधी : १० ते १२ दिवस
मंत्रालयातील अधिकारी म्हणाले…
पुढील आठवड्यात विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने १३ तारखेपूर्वी सर्व प्रलंबित विषयांवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने आज (मंगळवारी) दुपारी चारनंतर कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. यावेळी विषयांची संख्या भरपूर असल्याने तेवढे विषय या बैठकीत न झाल्यास बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा एक कॅबिनेट होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या