आघाडीत बिघाडी? पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधील ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त करताच, पत्रकार परिषदेतच आघाडीतील बिघाडी समोर आल्याचे दिसत आहे. यावेळी माविआतील नेते देसाई आणि आवाड या नेत्यांनी नाना पटोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.


उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर माविआच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी राऊतांबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्याशी सहमत नसतील तर ती त्यांची अडचण आहे, असे नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले. त्यानंतर अनिल देसाई आणि आवाड हे पटोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. दरम्यान, संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पटोले आणि राऊत यांच्यातील वादाबद्दल उद्धव ठाकरेंना विचारले असता, मी माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा जागांसाठी संघर्ष होतो, पण तो फुटेपर्यंत ताणू नये, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे. अजून ताण फुटला आहे हे माझ्या कानावर आलेले नाही. माझ्या कानावर आल्यावर मी त्यावर नक्कीच भाष्य करेन. दुसरीकडे शरद पवार यांनीही मध्यस्थीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटप उद्या किंवा दोन-तीन दिवसांत होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या