सांगलीत भाजपला धक्का : शरद पवारांनी भाजपचा आणखी एक मोहरा फोडला!

सांगली : समरजितसिंह घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा आणखी एक नेता गळाला लावला आहे. भाजपचे माजी आमदार आणि आटपाडी खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान वैभव पाटील हे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांचे वडील सदाशिव पाटील हे मात्र शरद पवार यांच्या गटाचे नेते आहेत. वैभव पाटील हे सदाशिव पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या भेटीसाठी आलो होते. वैभव पाटील, सदाशिव पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून वैभव पाटील हे तुतारीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने ही भेट असल्याचे देखील सांगितले जात आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे तुतारी हाती घेणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

2019 साली आटपाडी खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर निवडून आले होते. शिवसेनेतल्या बंडानंतर अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण काहीच महिन्यांपूर्वी अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाणार असल्यामुळे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजप सोडत पवारांची तुतारी हातात घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शरद पवार सांगली दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. जयश्री पाटील या काँग्रेसच्या सांगलीच्या इच्छुक उमेदवार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या