महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांचा समावेश देश विघातक कृत्यांमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा देखील या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
एनआयए आणि एटीएसच्या टीमने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तिघांचा दहशतवादी कृत्यात समावेश असल्याचा संशय आहे. तरुणांना ताब्यात घेतलेल्या तीनही ठिकाणी पंचनामा सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुड्याजवळील आझाद चौक भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
संभाजीनगर बरोबरच जालना आणि मालेगाव मधून देखील तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी पहाटे एनआयए कडून देश विघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. या आधी देखील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केली होती. आता जम्मू-कश्मीर मधील संघटनांचा यात समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या