शेतकरी समाधानी : सांडव्यातून पाणी बाहेर, सिध्देवाडी वॉटर फॉल येथे गर्दीत वाढ
सुट्टी व विकेंडला पर्यटकांची गर्दी
अल्पावधीतच चर्चेत आलेला सिध्देवाडी वॉटर फॉल हा तलाव भरल्याने प्रवाहित झाला आहे. सुट्टी व विकेंडसाठी या ठिकाणी आता पर्यटकांची गदीं वाढू लागली आहे. पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेत या ठिकाणी नक्कीच पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यास हरकत नाही.
SB मराठी (राजेश पाटील) : तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी मध्यम प्रकल्प यंदाही लवकरच ओव्हरफ्लो झाला असून यंदाही या तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. अल्पावधीतच तासगाव तालुक्यातील चर्चेत आलेला व सर्वसामान्य माणसाला भुरळ घालणारा या तलावाच्या लगत असणारा 'सिध्देवाडी वॉटर फॉल' निसर्गरम्य धबधबा आता पर्यटकांना खुणावू लागला आहे.
या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ व तलावात विविध प्रकारचे पशु-पक्षी आता मुक्तपणे विहार करणार असल्याने परिसरात नवचैतन्य व आल्हाददायी वातावरण आहे.
सावळज व वायफळे परिसराला वरदान ठरलेला सिध्देवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी बाहेर वाहू लागले आहे. याचा फायदा आता सावळज व परिसराला होणार असल्याने बळीराजात आनंदाचे वातावरण आहे. सततच्या पावसाने यंदा शेतकऱ्यांना नको नको म्हणण्या ची वेळ आली आहे. परिसरात चोहीकडे पाणीच पाणी अशी अवस्था आहे. चिखलाचे व तणाचे साम्राज्य असल्याने शेती मशागत व पेरणी कामे खोळंबली आहेत. या पावसामुळे अग्रणी नदी प्रवाहित झाली आहे.
परिसरात वरदान ठरणारा तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असणारा सिध्देवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाणी बाहेर पडल्याने परिसरातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या