वैभव पाटील यांना निवडणुकीत माझेच काम करावे लागेल : आमदार सुहास बाबर

सांगली : विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्रच बदलून गेल आहे. विटा नगरपरिषदेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्या गटातील संघर्ष आता टोकाला गेल्याचे दिसून येत आहे. काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पत्रकारांशी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर भाजप पक्ष प्रवेशावरून जोरदार टोलेबाजी केली. 
ते म्हणाले ज्या पद्धतीने शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती कदाचित प्रभावित होऊन आमचे जे विरोधक आहेत ते सत्तेमध्ये सामील होत आहेत. पक्ष वाढण्याचा अधिकार सगळ्यांना असतो पण जर महायुती राहिली तर मला असं वाटते की पुढचा उमेदवार मीच असेन आणि त्यांना सगळ्यांना माझं काम करावं लागेल.
वैभव पाटील यांच्या बद्दल आपल्यात निवडणुकीच्या संदर्भात जो काही वितुष्ट आहे का की ते मिटले? असा प्रश्न विचारला असता सुहास बाबर यांनी मतभेद हे राजकीय मतभेद आहेत त्यामुळे असं वैर आहे असं भाग नाही पण त्यांनी का प्रवेश केला हे त्याच उत्तर जनतेला द्यावं लागेल कारण त्यांनी सहा महिन्यापूर्वी भाजपला किंवा पर्यायान आमच्या महायुतीला वेगळ्या पद्धतीने त्यांचं भाषण झालं होतं बोलणं झालं होतं आज का त्यांनी स्वीकारलं हेच उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागेल पण माझ्यामध्ये मला असं वाटत की त्यांनी कदाचित कार्यपद्धती ओळखून किंवा त्यांच्या काही अडचणी असेल त्यांनी प्रवेश केला असेल. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती कायम राहिल्यास वैभव पाटील यांना माझेच काम करावे लागेल असे परखड मत व्यक्त करत आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलय. तसेच काही महिन्यापूर्वी भाजपावर टीका करणाऱ्या वैभव पाटील यांनी आता भाजपात प्रवेश का केला याचे उत्तर देखील जनतेला द्यावे लागेल अशी परखड भूमिका आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली आहे. अर्थातच शिवसेना आणि भाजप महायुतीचे घटक पक्ष असले तरी खानापूर मतदारसंघात मात्र टोकाचे राजकीय वैर असलेले आमदार बाबर गट आणि माजी आमदार पाटील गट यांच्यातील सत्ता संघर्ष आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भाजपा प्रवेशानंतर वैभव पाटील यांना आमदार पडळकर यांची ताकद मिळणार असल्याने तालुक्याच्या राजकारणात पाटील गट बाजी मारणार की बाबर गट आपला झंजावात कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या