जेजुरीत शैव आणि वैष्णवांचा मिलाप


झाडलोट करी जनी ।
केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं ।
नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला ।
नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला ।
काय उतराई होऊं तुला ॥४॥ 

आनंदाचे तरंग प्रत्यक्ष वारीत गेल्यानंतरच आपणाला अनुभवयास मिळतात. निसिम भक्ती, निस्वार्थ सेवा, प्रेम आणि मानव धर्म समजून घ्यायचा असेल तर, वारी केलीच पाहिजे. 
आज माऊलींच्या पालखीने अत्यंत अवघड असा दिवे घाट पार केलेला आहे. जगातील सर्व प्रवाह वरून खाली वाहत असतात भक्तीचा हा एकमेव प्रवाह असा आहे जो खालून वरती जाताना आपणाला अनुभवास मिळतो.
सासवड नगरीचा पाहुणचार घेतल्यानंतर माऊलींची पालखी जेजुरीत दाखल झाली आहे. यानिमित्त जेजुरीत शैव आणि वैष्णवांचा मिलाप झालेला दिसून येत आहे. आळंदी मधून पंढरपूर पर्यंत १७ मुक्काम करून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस परवणीचा असतो. कारण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन त्यांना घडतं. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करतात.
पावसाच्या सरी, अंगावर रोमांच आणणारी भक्तीची ऊर्जा आणि भक्तांच्या ओठांवर विठ्ठलनाम – हेच वारकरी संप्रदायाचं खरं वैभव!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी आज भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात जेजुरी येथे दाखल झाली. आळंदीहून निघालेली ही पालखी यात्रा परंपरेनुसार विविध ठिकाणी मुक्काम करत आज मल्हारी मार्तंडाच्या नगरीत, म्हणजेच खंडोबाच्या गडावर पोहोचली.

पालखी आगमनाच्या स्वागतासाठी जेजुरीमध्ये हजारो वारकरी आणि भाविक जमले होते. “ज्ञानोबा माउली तुकाराम”, “जय मल्हार” अशा गजरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पिवळ्या फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर, आणि भक्तांचा आनंदी उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण दैवी आणि आध्यात्मिक अनुभूती देणारे होते.

पालखीच्या आगमनानंतर खंडोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गड चढण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस आणि स्वयंसेवकांकडून योग्य सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.
आषाढी वारीतील हा महत्त्वाचा टप्पा असून, जेजुरीमध्ये पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. लाखो वारकऱ्यांसह हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. १५ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीला माउलीची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या